दापोली : रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठानने बालदोस्तांसाठी नुकतेच धम्माल शिबिर आयोजित केले होते. यात केवळ धमाल न करता प्रतिष्ठानतर्फे देशाच्या या भावी जबाबदार नागरिकांना जलसाक्षरतेचे धडे देण्यात आले. पाणी हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन किती आवश्यक आहे, याची जाणीव सहभागी मुलांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून करून देण्यात आली.
या मुलांना गिम्हवणे उगवतवाडी येथे नेण्यात आले होते. तेथे वर्षभर जिवंत असणारा झरा या सर्वांनी मिळून स्वच्छ केला. या प्रसंगी जलनायक आणि संस्थाध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी पाण्याच्या थेंबाथेंबाचे महत्त्व बालदोस्तांना समजावून सांगितले. या वेळी संस्थेच्या संचालिका अस्मिता परांजपे, राकेश आंबेरकर, प्रा. शिंदे, नूतन परांजपे, मारुती सपकाळ आणि उगवतवाडीच्या श्री जाकमाता देवी मंदिर मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय लवरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
(निवेदिता प्रतिष्ठानतर्फे प्लास्टिक आणि कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)